नवी दिल्ली : सध्या देशात टोमॅटोची आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ झाली आहे. बाजारात 150 ते 200 रुपये प्रतिकिलो या दराने नागरिक टोमॅटो विकत घेत आहेत.दरम्यान, या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा शेजारील देश नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली.
आज नेपाळमधून भारतात टोमॅटोचा पहिला लॉट दाखल होणार असल्याचे निर्मला सीतारामण म्हणाल्या. त्यामुळं भारत आता नेपाळमधून टोमॅटो आयात करणार असल्याची माहिती सीतारामण यांनी लोकसभेत दिली. टोमॅटोचो आयातीचा पहिला लॉट आज उत्तर भारतातील वाराणसी, लखनौ आणि कानपूर शहरात पोहोचण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या. घाऊक बाजारात टोमॅटोच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या 150 ते 200 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री केली जात आहे.
अवकाळी पाऊस, जास्त तापमान आणि पिकावर झालेला विषाणूंचा प्रादुर्भाव याचा टोमॅटोवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी टोमॅटोचे पिक वाया गेले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकाचं नुकसान झाल्यामुळं बाजारात कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळं दरात वाढ होताना दिसत आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला याचा परिणाम दरांवर झाला आहे.
टोमॅटोच्या किंमतीत झालेली वाढ तसेच तृणधान्ये, डाळींच्या किमंतीतही वाढ झाली आहे. त्यामुळं महागाई वाढल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. ते चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत बोलत होते. भाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. जून आणि जुलै महिन्यात टोमॅटोच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळं महागाई वाढल्याचे दास म्हणाले.