नवी दिल्ली – अल कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तिघाजणांना गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथक अर्थात “एटीएस’ने राजकोट येथून अटक केली आहे. अटक केलेले तिघे जण इतरांना कट्टरवादी कारवायांमध्ये खेचण्याच्या उद्देशाने “अल कायदा’च्या बांगलादेशी हस्तकांसाठी काम करत होते, असे सकृतदर्शनी उघड झाले आहे. हे तिघेही मूळचे पश्चिम बंगालमधील असून राजकोटमधील सोन्याच्या बाजारात काम करत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शुक्रा अली, शैफ नवाज आणि अमान मलिक अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांबद्दल गुजरात “एटीएस’ला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर या तिघांवर गेल्या 3-4 दिवसांपासून बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, असे “एटीएस’चे पोलीस अधिक्षक ओम प्रकाश जाट यांनी पत्रकारांना सांगितले.
अटक केलेल्या तिघांकडून सेमी ऍटोमॅटिक पिस्तुल, काट्रेज, कट्टरवादी साहित्य, व्हिडीओ आणि अन्य काही साहित्य जप्त करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. बांगलादेशातील हस्तकांच्या संपर्कात राहण्यासाठी हे तिघेही टेलिग्राम या मेसेजिंग ऍपचा वापर करत असत. या हस्तकांनी या तिघांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यामध्ये कट्टरवादी कारवायांमध्ये इतरांना सहभागी करून घेण्याचेही काम होते.
यापूर्वी मे महिन्यात गुजरात “एटीएस’ने अल कायदाचे मोड्युल उद्ध्वस्त करून बांगलादेशातील चौघाजणांना अटक केली होती. ते अहमदाबादमध्ये बेकायदेशीरपणे रहात होते. त्यांना बांगलादेशातील हस्तकांनी प्रशिक्षण देऊन भारतात पाठवले होते.