न्हावरे – न्हावरे (ता.शिरूर) परिसरातील तांबेवस्ती येथे बिबट्यांनी कधी दिवसा तर कधी रात्री कुत्रे व बदकांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. दरम्यान या घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये करोना बरोबरच बिबट्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
न्हावरे परिसरातील तांबेवस्ती येथे मेंढपाळ व्यवसायिकांची मोठी वस्ती आहे. या परिसरात शेळ्या, मेंढ्या, गायी, कोंबड्या, बदक, कुत्रे हे पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. या वस्तीलगतच आलेगाव लघुपाटबंधारा आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याला भक्ष्य म्हणून सर्व प्रकारचे पाळीव प्राणी अगदी सहज मिळत असल्याने, त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्यामुळे आणि बिबट्याला लपण्यासाठी शिवारात उसाची मोठी शेती उपलब्ध आहे.त्यामुळे बिबट्याचा वावर या भागात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
येथील शेतकरी बाजीराव बाबासाहेब साठे यांच्या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यावर तसेच 10 बदकांवर बिबट्याने हल्ला करून त्या सगळयांचा फडशा पाडला आहे. तसेच येथील मेंढपाळ व्यवसायिक आबासाहेब कोकरे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्यांनी हल्ला केला होता.
मात्र, त्यांनी व त्यांची मुले शिवाजी कोकरे व राजेंद्र कोकरे यांनी मोठ्या धाडसाचे आणि शिताफीने बिबट्यांना मेंढ्यांच्या कळपातून परतवले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
माजी उपसरपंच अरूण तांबे यांच्या उसाच्या शेतात शनिवारी (दि.11) बिबट्या आणि त्याची पिल्ले आढळून आली होती. यासंदर्भात माजी उपसरपंच अरूण तांबे यांनी वनविभागाला कळविले असता, वनविभागाने या परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.
रात्री वीजपुरवठा
सध्या शेतीसाठी रात्री थ्री फेज वीजपुरवठा होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेताला पाणी द्यावे लागत आहे. दरम्यान बिबट्यांच्या वाढत्या हल्यामुळे याभागातील शेतकरी भयभयीत झाले आहेत. वनविभागाने बिबट्यांच्या होणाऱ्या हल्यांचा तसेच याभागातील बिबट्यांच्या वाढत्या प्रमाणावरील वावर याबाबत गांभीर्याने लक्ष घालून यासंदर्भात ठोस उपाययोजना करून ही समस्या तातडीने सोडवावी.अशी मागणी सरपंच ताई तांबे व डॉ. अजित कोकरे यांनी केली आहे.