भुलेश्वर – माळशिरस (ता. पुरंदर) येथील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला असलेल्या भुलेश्वर घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यात आले आहे, त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भुलेश्वर महादेवाची श्रावण यात्रा सुरू होत असून, या काळात देशभरातून भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात. येथे संरक्षक कठडे नसल्यामुळे भुलेश्वर घाट धोकादायक बनला होता. या संदर्भातील वृत्त दैनिक “प्रभात’मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटामध्ये लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने श्रावण यात्रेपूर्वी या कामाला सुरुवात केल्यामुळे ग्रामस्थ व भुलेश्वर भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस व दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील यवत या दोन गावांना जोडणारा हा रस्ता आहे. मात्र, अनेक वर्षांपासून संरक्षण कठडे नसल्यामुळे घाट दिवसेंदिवस वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. सध्या घाटामध्ये संरक्षक कठडे बसविण्याचे काम सुरू आहे.
माळशिरस ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन यादव, माजी उपसरपंच माऊली यादव, युवा सेनेचे माळशिरस गणाचे सरचिटणीस निखिल यादव, रणजीत ताम्हाणे, अविनाश यादव, सुनील यादव यांनी घाट परिसरामध्ये जाऊन कामाची पाहणी केली.