भुलेश्वर – महाराष्ट्रात जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला पुरंदर तालुक्यातील माळशिरस व दौंड तालुक्यातील दोन गावांना जोडणारा भुलेश्वर घाट आहे. या घाटाची दुरुवस्था झाली असून अवघड वळणार संरक्षक कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे लवकरात लवकर घाटाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
याच घाटातून पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या यवत येथून थेट पुणे-बंगलोर महामार्गावर असणाऱ्या कापूरहोळ या ठिकाणी जाता येते. आजपर्यंत अनेक वेळा या घाटाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. 1972च्या दुष्काळामध्ये या घाटात संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. त्यानंतर आजपर्यंत संरक्षक भिंत पुन्हा बांधण्यात आली नाही. अवघड वळणावर संरक्षण कठडे नसल्यामुळे घाटामधून प्रवास करणे दिवसेंदिवस धोक्याचे होत चालले आहे.
या घाटाच्या वर असणाऱ्या भुलेश्वर देवस्थान येथील श्रावण यात्रा लवकरच सुरू होत आहे. यात्रा काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भुलेश्वर भक्त तसेच पर्यटक याच घाटातून मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे यात्रा सुरू होण्याच्या आधी घाटाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आंबेनळी येथे झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती या घाटात होऊ नये. यासाठी या घाटात लवकरात लवकर संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे.
महादेव बोरावके, सरपंच माळशिरसभुलेश्वर घाटात लवकरात लवकर लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
अनिल शिंदे, सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सासवड