मुंबई – भिवंडीतील वळपाडा इमारत दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. मात्र अजूनही ढिगाऱ्याखाली 7 ते 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शनिवारी दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर एनडीआरएफसह टीडीआरएफच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. कालपासून सुरू असलेल्या बचावकार्यानंतर तब्बल 20 तासांननंतर एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचा आज वाढदिवस असल्याने त्याला जीवनदान मिळाले आहे.
सुनील पिसाळ असे बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील गोदामात हमालीचं काम करत होता. दुर्घटना घडली त्यादिवशी नेहमीप्रमाणे तो गोदामात काम करत होता. मात्र इमारतीची भिंत त्याच्या अंगावर पडली आणि तो अडकला. 20 तास अन्न पाण्याविना तो बचावासाठी बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता. मात्र त्याला ते जमलं नाही. अखेर त्याला 20 तासांच्या प्रत्यत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले.
बाहेर येताच सुनीलने हात जोडून एनडीआरएफच्या जवानांचे आभार मानले. याशिवाय उपस्थितांनी जल्लोष करत त्याला वाढदिवसाच्या आणि जीवनदान मिळाल्याच्या शुभेच्छा दिल्या. सुखरुप बचावल्यानंतर सुनीलसह त्यांच्या कुटुंबांचेही डोळे पाणावले होते.
#WATCH | Bhiwandi building collapse update | A man rescued by NDRF and TDRF after more than 20 hours.
(Source: Thane Municipal Corporation) pic.twitter.com/QWEwZMMUYY
— ANI (@ANI) April 30, 2023
दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली. तसेच आगामी पावसाळा लक्षात घेता अगदी केव्हाही पडू शकतील अशा धोकादायक इमारतींचं सर्व्हेक्षण करून त्या इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे सांगितले.