पुणे – शिरूर लोकसभा मतदार संघ हा बैलगाडा शर्यतीच्या राजकारणावर गेल्या अनेक वर्षांपासून अवलंबून असलेला पाहायला मिळतो. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याच राजकारणावर गेल्या तीनही लोकसभा निवडणुका जिंकून इतिहास घडविला. मात्र तोच इतिहास डॉ. अमोल कोल्हे यांनी मोडीत काढला. शिरूर लोकसभा मतदार संघावर डॉ. कोल्हेंच्या रूपाने राष्ट्रवादीला खासदार मिळाला.
याच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. कोल्हे यांनी मतदारांना आश्वासन दिले होते की, “ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी म्होरं घोडी धरणार म्हणजे धरणार..”. त्यानिमित्ताने आज (१६ फेब्रुवारी) निमगाव दावडी येथील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा घाटात शर्यतीची बारी भरवण्यात आली होती.
एकूण 350 बैलगाडा मालक सहभागी झाले होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः दावडी निमगावच्या घाटात घोडी धरत मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. इतकच नव्हे तर बैलगाडा शर्यतीवरुन शिरून मतदार संघातून विरोधक शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांच्या आव्हानालाही चोख उत्तर दिले आहे. यावेळी बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर एकच जल्लोष घाटावर पाहिला मिळाला. आणि याच जल्लोषात अमोल कोल्हेंनीही आपली घोडेस्वारीची कौशल्य दाखव दोन्ही हात सोडून बारी मारली