ठोस निर्णयाबाबत प्रयत्नांचे आश्वासन : ऊस उत्पादकांची उपेक्षा कायम
राजेंद्र काळभोर
लोणी काळभोर : आगामी गळीत हंगामात दौंड तालुक्यातील भीमा – पाटस सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर सुरु होणार आहे. परंतु हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु होण्याचे आश्वासन दिलेल्या सर्वपक्षीय नेतेमंडळींनी मात्र यशवंत संदर्भात काहीच ठोस भूमिका न घेतल्याने यशवंतच्या सभासदांना सर्वांनीच वाऱ्यावर सोडले आहे.
गेली तीन गळीत हंगाम बंद असलेला भीमा – पाटस कारखाना येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. आजपासून कामगारांना कामावर बोलावण्यात आले आहे. कर्नाटकमधील निरानी ग्रुपने हा कारखाना सुरू केला आहे. भीमा कारखाना व निरानी ग्रुपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कारखान्याची पाहणी केली आहे.
सभासद व कामगारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. भीमा-पाटस कारखान्याच्या शेजारीच असलेला यशवंत कारखाना कधी सुरू होणार? असा सवाल सभासदांसह परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे.
पूर्व हवेलीमधील हजारो उस उत्पादकांच्या रोजीरोटीशी निगडीत असलेला कारखाना 11 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारखाना सुरू करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यासंदर्भात अनेक वर्षे प्रयत्न सुरु आहेत, असे सभासदांना सांगितले जाते. मात्र कारखाना सुरू होत नाही.
कार्यक्षेत्रात उरुळी कांचन, लोणी काळभोर, कोलवडीसह पूर्व हवेलीत हजारो एकर उसाची लागवड केली जाते. मात्र कारखाना बंद असल्याने, शेतकऱ्यांना कमी दरात ऊस द्यावा लागत आहे. यामुळे यशवंत कारखाना लवकरात लवकर सुरू होण्याची गरज आहे. कारखाना बंद पडल्यापासून चौथे राज्य सरकार सत्तेवर आले आहे. मात्र कारखाना सुरु झालेला नाही.
2014 मध्ये कारखान्याच्या कर्जाची मर्यादा संपुष्टात आली आहे. त्यानंतर कोणत्याही वित्तीय संस्थेकडून निधी उपलब्ध होऊ शकला नाही. 2011 पासून आज अखेर कारखाना बंद अवस्थेत आहे. अकरा वर्षांत कारखाना सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु यश आले नाही. त्यामुळे कारखान्याचे कामकाज आर्थिक व प्रशासकीय अडचणींमुळे ठप्प झाले आहे.
सहकारातील तरतुदीनुसार कारखाना सुरू होण्यास असमर्थता निदर्शनास आल्याने अवसायनात घेण्याबाबत प्रादेशिक सहसंचालक यांनी 2014 मध्ये निर्णय घेतला. त्यामुळे यशवंतची अवस्था “जैसे थे’ होती. मात्र आमदार अशोक पवार यांनी पुढाकार घेतल्याने तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हा आदेश रद्द केला आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नागरीकरण जरी वाढले आहे. प्रतिदिन 1250 किंवा 2500 मेट्रीक टन गाळप क्षमता असलेला एक कारखाना आरामशीर चालू शकतो. परिसरात गुऱ्हाळेही मोठ्या संख्येने सुरू आहेत. या गुऱ्हाळांनी ऊस न्यावा म्हणून शेतकऱ्यांना गुऱ्हाळ मालकांच्या पाया पडावे लागते. तसेच गुऱ्हाळ चालकांची संघटना असल्याने संघटना ठरवील तोच भाव शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना उसाचा बाजारभाव कमी मिळतो. त्यामुळे तालुक्यात कारखाना सुरू होण्याची गरज आहे.
– ज्ञानेश्वर काळभोर, ऊस उत्पादक शेतकरी
कारखाना बंद झाल्यापासून कामगारांची परिस्थिती हलाखीची आहे. गेली अनेक वर्षे पगारही मिळाला नाही. ओव्हर टाईमचे 2 कोटी रुपये मिळणे बाकी आहेत. कामगारांचे एकुण 40 कोटी रुपये येणे बाकी आहेत. दरम्यानच्या काळात निवृत्त झालेल्या कामगारांचे ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंड फंड व निवृत्ती वेतनाचे अर्जही भरुन घेतलेले नाहीत. कारखाना सुरू होण्याची अपेक्षा आहे.
– अशोक गायकवाड, माजी कामगार संचालक