नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांसाठी भारत जोडो यात्रेतून ब्रेक घेतला असून ते आज म्हणजे गुरूवारी नवी दिल्ली येथे परतले आहेत. आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर यात्रा पुन्हा प. बंगाल येथून पुढे मार्गस्थ होईल असे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले.
२६ जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिवस साजरा केला जाणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांच्या आरामानंतर प. बंगालच्या जलपैगुडी, अलिपुरद्वार, उत्तर दिनाजपुर आणि दार्जिलिंग या जिल्ह्यातून यात्रा जाणार आहे.
२९ जानेवारी रोजी यात्रा बिहारमध्ये प्रवेश करेल व त्यानंतर ३१ जानेवारी रोजी मालदा मार्गाने पुन्हा बंगालमध्ये दाखल होईल. दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अगोदरच स्वत:ला इंडिया आघाडीपासून अलिप्त केले असल्यामुळे त्या यात्रेत सहभागी होणार नाहीत. तर बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भूमिका बदलण्याच्या तयारीत आहेत व त्यांनीही अगोदरच यात्रेपासून अंग काढून घेतले आहे.
ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर
लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे एक सस्पेन्स निर्माण झाला आहे. ४२ खासदार निवडून देणाऱ्या या राज्यात त्यामुळे इंडिया आघाडी दुबळी होणार असून भाजपच्या विरोधात एकास एक लढत देण्याची रणनीती आता बहुतेक संपुष्टात येण्याची शक्यता आहे.