जामखेड/आष्टी (प्रतिनिधी) – बीड जिल्हातील आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर सुरुच आहे. मागील 15 दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला असुन आज पुन्हा सकाळपासूनच विजेच्या कडकडाटासह पावसाने तब्बल 2 तास धुमाकूळ घातल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत परतीच्या पावसाने कोसळधारा सुरुच ठेवल्या. त्यामुळे काढणीला आलेली पिके पाण्यात गेली आहेत. पांढरी परिसर, आष्टा महसूल मंडळात सकाळी ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. यामुळे शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान अहमदनगर-जामखेड महामार्गावरील वाहतूकही विस्कळित झाली आहे. महामार्गावरून गुडघ्या पर्यंत पाणी वाहत होते. प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातील पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून मागील 15 दिवसांपासून पाऊस पाठ सोडायला तयार नाही. आज पुन्हा सकाळपासूनच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जोरदार पावसाने पांढरी, करंजी, पांगुळगव्हाण, क-हेवडगांव, क-हेवाडी, मातकुळी, वनवेवाडी, पोखरी, हाजीपुर या परिसरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले. नदी नाल्यांना पुर आल्याने वाहतूक ठप्प आहे. काही गावांचा संपर्क देखील तुटला.
गावातील ग्रामस्थ पुलावरून पाणी वाहत असल्याने अडकून पडले होते. विद्यार्थी, नौकरदार, दुध घेऊन जाणारे शेतकरी जोरदार पावसामुळे घरातच अडकून पडले आहेत. पांढरी व आष्टा महसूल मंडळ परिसरात सकाळी 9 वाजेपासून पावसाने हाहाकार माजवला असुन शेत जलमय झाले आहेत. पूर्ण शेत पिक पाण्याखाली आहे. शेतक-यांचे अतोनात नुकसान झालं असून शेतांना तळ्यांचे स्वरुप प्राप्त झाल्याने सोयाबीनला कोंब येण्याची भीती आहे. कापुस, कांदा, तुर पीक शेतात झोपल्याने पाण्यात कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोसावलेली पिके अशा पद्धतीने संकटात आल्याने बळीराजाचे दु:ख काही संपत नाही, अशी स्थिती आहे.
तालुक्यातील सोलेवाडी येथील नगर जिल्ह्यातील गावांना जोडणारा पुल परतीच्या पावसाने वाहुन गेला आहे. सकाळपासून पूर आल्याने या मार्गावरील जामगांव, देविगव्हाण, वाळुंज, डोणगांव, अरणगांव, पारेवाडी, या गावातील वाहतूक ठप्प आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थी, नौकरदार, नागरिक अडकून पडले आहेत. तर सोलेवाडी येथील नदीच्या बाजूच्या घरात पाणी शिरले असून जीवनपयोगी वस्तू पाण्यात आहेत. अतोनात नुकसान ह्या पावसाने झाले आहे. पुरस्थिती निर्माण झाली आहे. तात्काळ शेतकर्यांना मदत देऊन पूल बांधण्याची मागणी राम झगडे यांनी केली आहे.
परतीच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातल्या काही मंडळात प्रचंड नुकसान झाले आहे. जमिनी खरडून वाहून गेल्या आहेत. प्रशासन यावर नजर ठेवून असली तरी पुढचे काही दिवस पंचनाम्याला जातील. खरिपाचे पिक हातातून गेल्याचे सांगत विमा कंपनी शेतकर्यांना नुकसानीचे फोटो अपलोड करायला सांगते परंतू शेतकर्यांना ते जमत नाही. त्यामुळे स्वत: कंपनीने या भागात येवून पंचनामे करत अपलोड करावे. अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.