मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी सणानिमित्त जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी काळात 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान राज्यभरात 1494 जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी माहिती दिली आहे. तसेच प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाकडून महाराष्ट्रातील प्रमुख सण-उत्सव होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी, आषाढी यात्रा आदी काळात जादा बस गाड्या सोडण्यात येतात. यातून महामंडळाला अधिकचे उत्पन्न मिळत असते. दिवाळी सणानिमित्त राज्यभरातून चाकरमाणी तसेच बाहेरगावी वास्तव्यास असलेले नागरिक आपल्या मुळ गावी तसेच नातेवाईकांकडे जात असतात. अशावेळी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी देखील प्रशासनाकडून जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला जातो.
चन्ने यांनी सांगितले की, प्रवाशांची गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्या वाढवली जाणार आहे. सध्या औरंगाबाद येथून 368, मुंबई, 228, नागपूर 195, पुणे 358, नाशिक 274, अमरावतू येथून 71 बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. 75 वर्षांवरील नागरिकांसाठी एसटीमध्ये मोफत प्रवासाची सुविधा असून 65 ते 75 वर्षादरम्यानच्या नागरिकांना 50 टक्के सवलतित तिकीटाने प्रवास करण्याची सुविधा आहे.