नवी दिल्ली – उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात काल हिमकडा कोसळण्याची एक विनाशकारी घटना घडली. या घटनेमुळे सगळे स्तब्ध झाले असून जगभरातील शास्त्रज्ञ यामागील कारणांचा विचार करत आहेत. त्याला कारण म्हणजे थंडीच्या दिवसात अशा प्रकारे हिमकडा कोसळण्याचा प्रकार ही सामान्य बाब नसल्याचे मानले जात असून अमेरिकेतील संशोधकांनीही तीच चिंता व्यक्त केली आहे. याचे तार कुठेतरी जागतिक तापमान वाढीशी जुळले असण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.
हिमकडा कोसळण्याच्या कालच्या या दुघर्टनेत ऋषी गंगा प्रकल्प पूर्णत: कोसळला असून या भागांत सुरू असलेल्या अन्य प्रकल्पांवरही आता संकटाचे ढग तयार झाले असल्याचे बोलले जाते आहे. याबाबत बोलताना पर्यावरणवादी अनिल जोशी म्हणाले की दुर्घटनेचे स्वरूप आणि व्याप्ती पाहता वातावरणातील बदलामुळेच हे झाले असावे असे म्हणता येउ शकते. तापमानात वाढ झाल्यामुळेच हिमशिखर आपल्या जागेवरून सरकले व त्यामुळेच एवढे मोठे नुकसान झाले आहे.
हिमशिखराजवळ अशा कोणत्याही प्रकल्पाला अथवा बांधकामाला मंजूरी दिली जाउ नये असे जोशी यांचे म्हणणे आहे. हिमकडा कोसळल्यामुळे एखाद्या पुरासारखे पाणी खाली आले आणि आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्याने वाहून नेले.
न्यूयॉर्क टाइम्सनेही प्रत्यक्ष साक्षीदारांच्या हवाल्याने हे वृत्त छापले आहे. प्रचंड आवाजाने पाणी येत होते व हा आवाज कित्येक किमी अंतरापर्यंत ऐकता येउ शकत होता, असे त्यांच्या बातमीत म्हटले आहे.
दरम्यान, या संदर्भात काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या एका संस्थेच्या अहवालानेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ भारतातील कालची घटना नाही, तर जगभरातील असे हिमकडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निरिक्षण यात नोंदवण्यात आले आहे.
हंदुकुश हिमालय क्षेत्रात अलिकडच्या काळात वाढत्या तापमानासोबतच बर्फवृष्टीच्या घटनांतही बदल नोंदवले गेले आहेत. हिमालयाच्या क्षेत्रात अशा प्रकारे किमान पाच हजार हिमशिखरे आहेत. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्यांना धोका असल्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे.