पिरंगुट (पुणे) -कासारआंबोली (ता. मुळशी) ग्रामपंचायतीमधील बिअर शॉपी नाहरकत प्रमाणपत्र प्रकरणी मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी चौकशी केली आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) यांना हा अहवाल पाठवला आहे.
कासारआंबोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मोहन शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी माजी सरपंच हिरा कांबळे, माजी सदस्य महेश मानकर व प्रकाश कांबळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बिअर शॉपी साठी ना हरकत दाखले घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर हा अहवाल केला आहे. गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोणत्याही बिअर शॉपीला किंवा दारूविक्री व्यवसायाला ना हरकत दाखले देताना प्रथम महिला सभेची मान्यता घ्यावी लागते. मासिक सभेत सर्वांची मंजुरी घेऊन हा विषय विषय पत्रिकेवर ठेवून ग्रामसभेत ठराव मंजूर करावा लागतो. हे झाल्यानंतरच एनओसी संबंधित अर्जदाराला दिली जाते. येथे अशा पद्धतीने ही कार्यवाही झालेली नाही.
तसेच प्रकाश कांबळे, प्रतीक कांबळे व महेश मानकर या तिघांपैकी कोणाचाही बिअर शॉपी ना हरकत दाखला मिळावा असा कोणताही अर्ज ग्रामपंचायतीला आलेला नाही. बिअर शॉपीसाठी ना हरकत दाखला देण्यासाठी महिला सभा, मासिक सभा व ग्रामसभा या तीनही सभांपुढे हे विषय आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना ना हरकत दाखले देणेबाबतची मंजुरी या सर्वांनी दिलेली नाही. नियमानुसार आवश्यकता असलेल्या मान्यता झालेल्या नाहीत. एनओसीच्या स्थळप्रती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध नसून जावक नोंदवहीमध्ये घेऊन गेली बाबतची स्वाक्षरी पोहोच दिसून येत नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या एनओसी पडताळणीसाठी या कार्यालयाकडे आल्यास योग्य ती कारवाई करता येईल.