नवी दिल्ली – अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा व वृद्दिमान साहा या चार खेळाडूंना आता यापुढे संघ निवडीसाठी तुमचा विचार केला जाणार नाही, असा थेट इशारा बीसीसीआयने दिला आहे.
या चारही खेळाडूंना अशा पद्धतीने इशारा देण्याची ही पहिलीच वेळ असली तरीही येत्या काळात भारतीय संघाकडे सक्षम पर्याय ठरत असलेल्या खेळाडूंना सातत्याने संधी देण्यात येणार आहे. येत्या काळात श्रीलंका व दक्षिण आफ्रिका यांचे संघ भारतात येत आहेत. या मालिकेत कसोटी सामनेदेखील होतील. मात्र, त्यात या चारही खेळाडूंचा विचार केला जाणार नाही, असेही संकेत देण्यात आले आहेत.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. भारतीय संघाच्या निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी या चार खेळाडूंना संघात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवड समिती आता काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापनातील अन्य सदस्यांनी चर्चा करून हा घेतला आहे.
इशांत व साहा यांच्या नावावर काटच मारली गेल्याचे स्पष्ट दिसत असून, रहाणे आणि पुजारा यांनी येत्या काळात रणजी करंडक स्पर्धेसह देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी केली, तर त्यांना पुन्हा संघात संधी मिळू शकते. या दोघांची कामगिरी गेल्या काही दिवसांत खराब झाली आहे. स्वत: बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीने त्यांना देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा सल्ला दिला होता.