मुंबई :- आशिया करंडक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ मायदेशातच सर्वाधिक सामने खेळणार आहे. त्यासाठीच बीसीसीआयने टीव्ही व डीजीटल प्रसारण हक्कांचा लिलाव करण्याचे निश्चित केले आहे.
पुढील पाच वर्षांत जवळपास 88 सामने भारतीय संघ मायदेशात खेळणार आहे. त्यामुळेच या सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क विकले जाणार असून यातून बीसीसीआयला तब्बल 8 हजार 200 कोटी रुपये मिळणार आहेत.
2023 ते 2028 या कालवधीत भारतीय संघ वेगवगळ्या स्पर्धा तसेच मालिका खेळणार आहे. पुढील 5 वर्षात भारतात होणाऱ्या सामन्यांचे माध्यम हक्क विकण्याबाबत निविदा जाहीर केली आहे. त्यातूनच बीसीसीआयला अपेक्षेपेक्षाही जास्त मोठी रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. या लिलावाची रक्कम एक अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंतही जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पाच वर्षांच्या या नवीन चक्रामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 21 सामने (5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 10 टी-20) तसेच इंग्लंडविरुद्ध 18 सामने (10 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20) आहेत. भारताला एकूण 25 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 36 टी-20 सामने खेळायचे आहेत.
गेल्या पाच वर्षांच्या चक्रात 2018 ते 2023 या कालावधीसाठी स्टार इंडियाकडून बीसीसीआयला जवळपास 6138 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यात प्रत्येक सामन्यासाठी 60 कोटी रुपये मिळाले होते. यावेळी दोन्ही हक्कांचा लिलाव वेगवेगळा केला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या माध्यम हक्क विक्रीतून बीसीसीआयला 48,390 कोटी रुपये मिळाले होते.
यावेळी ई लिलाव होणार…
भारतातील देशांतर्गत सामन्यांसाठी डिस्ने-स्टार, रिलायन्स-व्हायकॉम हे मुख्य दावेदार असून बीसीसीआयकडून ई-लिलाव आयोजित केला जाणार आहे. याआधी 2018 साली माध्यम हक्कांचा लिलाव ऑफलाइन करण्यात आला होता. यावेळी टीव्ही आणि डिजिटलसाठी स्वतंत्र हक्क विकले जाणार आहेत.
यापूर्वी या दोन्हीचे हक्क स्टारकडे होते.भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यावेळी स्टार इंडियासह जिओ सिनेमा तसेच अन्य मोठ्या कंपन्या या हक्कांच्या लिलावात बोली लावण्याची शक्यता आहे.