मुंबई – खराब कर्जामुळे कराव्या लागणाऱ्या मोठ्या तरतुदीमुळे चौथ्या तिमाहीत बडोदा बॅंकेला 991 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला 3102 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यापेक्षा या तिमाहीत झालेला तोटा कमी आहे.
बॅंकेला या तिमाहीत कराव्या लागणाऱ्या तरतुदीत 21 टक्क्यांची वाढ होऊन ती 5550 कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला 7053 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती.
याबाबत बोलताना बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक पी एस जयकुमार यांनी सांगितले की, बॅंकेचा ताळेबंद आता सुधारू लागला असून पुढील तिमाहीत तो नफादायक होण्याची शक्यता आहे. या बॅंकेत या तिमाहीत विजया बॅंक आणि देना बॅंकेचे विलीनीकरण झाले आहे. त्या प्रक्रियेकडेही बॅंकेला आगामी काळात बरेच लक्ष द्यावे लागणार आहे. बॅंकेने कर्ज वसुली मोहीम यशस्वीपणे राबविली आहे. त्यामुळे आगामी काळात बॅंकेचा नफा आणि उत्पन्न वाढेल असे त्यांनी सांगितले.