बारामती – बारामती तालुक्यातील वनविभागात 55 पेक्षा अधिक गावे आणि 6 हजार 500 हेक्टर क्षेत्र आहे. सात महिने बारामती वन विभागाचा गाडा प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बळावर हाकला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती वनविभागाला पूर्णवेळ वनपरीक्षेत्र अधिकारी नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंदापूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे हे बारामतीचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी आहेत. दत्तात्रय भरणे हे वन राज्यमंत्री आहेत. तरीदेखील बारामतीला पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी मिळेना, अशी अवस्था वनविभागाची झाली आहे.
बारामती तालुक्यात वनविभागाचे 6 हजार 500 हेक्टर क्षेत्र आहे. 55 गावांत मोठा विस्तार आहे. वनविभागात सध्या 7 वनरक्षक, 2 वनपाल, 15 वनमजूर कार्यरत आहेत. 1 वनपाल व एक वनक्षेत्रपालची जागा रिक्त आहे. वनक्षेत्रात चिंकारा, हरीण, खोकड, कोल्हे, लांडगे, ससे असे वन्यप्राणी आहेत. या हद्दीत वन्यप्राण्यांची शिकार केली जात आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आहे. 55 गावांचा कारभार हा इंदापूरच्या अधिकाऱ्यांना हाकावा लागत असल्याने दोन्ही तालुक्यांचा बट्टयाबोळ करण्यासारखा आहे. प्रभारी अधिकाऱ्यांना दोन तालुक्यांचा कार्यभार पाहताना दमछाक होत आहे.
बारामती वन विभागाचे तत्कालीन वनपरीक्षेत्र अधिकारी यांची इंदापूर येथे बदली झाली. यानंतर इंदापूर येथील वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे हे दि. 20 जानेवारीपासून बारामती येथे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सद्यस्थितीमध्ये मात्र, इंदापूरला देखील वनपरीक्षेत्र अधिकारी नसल्याने सात महिन्यांपासून बारामती व इंदापूर तालुक्यांचा कार्यभार काळे हे पाहत आहेत. शासनस्तरावर याबाबत लवकरच निर्णय होईल, असे काळे यांनी सांगितले. मात्र, महामारीचा निपटारा करण्यात राज्यशासन गुंतल्यामुळे पूर्णवेळ अधिकाऱ्यांची प्रतीक्षा तालुक्याला लागून राहिली आहे.
सर्व्हे आणि अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू
प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे म्हणाले की, वनविभागात कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशा प्रमाणात आहे. वनविभागाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी देखील सहभाग घेतला पाहिजे. ज्या गावात वनविभागाच्या क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे किंवा होत आहे, अशा गावातून नागरिकांनी तक्रारी द्याव्यात. त्यानंतर वन विभाग कारवाई करेल. ज्या गावात वनविभागाचे क्षेत्र कमी होत आहे. त्या गावांचा सर्व्हे केला जात आहे. हद्दी कायम करण्याचे काम सुरू आहे. मात्र, कोणत्या गावात वनविभागाच्या क्षेत्रावर किती प्रमाणात अतिक्रमण झाले आहे, हे मात्र स्पष्ट झाले नाही. वरिष्ठ पातळीवरून वन सर्वेअरकडून याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र, लवकरच ज्या गावात वनविभागाच्या क्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे. त्या गावातील वनविभागाची हद्द कायम केले जाईल.