माळेगाव येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
बारामती-राज्यात सरकार आल्यावर बारामतीला टॅंकरमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. या परिसरात एकही टॅंकर दिसणार नाही प्रत्येक शिवारात पाणी आणून दिले जाईल. या भागाचा विकास भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बारामती विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस माळेगाव येथे जाहीर सभेत बोलत होते. यावेळी दिलीप खैरे, अविनाश मोटे, चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे ,प्रशांत सातव, कुलभूषण कोकरे, वैष्णवी कोकरे , संदीप चोपडे, राजेंद्र काळे पांडुरंग कचरे, अमोल सातकर यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या सरकारला शेतीतील व कारखानदारीतील काही कळत नाही असे पवार सगळीकडे सांगत असतात मग भाजपाच्या नेतृत्वाखाली चाललेल्या माळेगाव कारखान्या एवढा भाव पवारांच्या ताब्यात असलेले कारखाने का देऊ शकत नाहीत असा सवालही मुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित केला. बारामतीत आता यापुढील काळात लोकशाहीच्या माध्यमातून जनता जागा दाखवेल . परिवर्तन करून पवारांना घरी बसवा, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.