नालासोपारा: आम्हाला गुंडांची गरज नाही, आमच्याकडे माता भगिनींच रक्षण करणारे शिवसैनिक वीर आहेत,असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज नालासोपारा मतदारसंघात प्रचार सभा घेतली दरम्यान ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी ज्या ज्या वेळी या विभागात आलो आहे किंवा या विभागातले कोणी मातोश्रीवर आले आहेत तेव्हा एकच मागणी केली आहे की साहेब कोणतरी आम्हाला कणखर द्या, आम्हाला यांची दादागिरी मोडून काढायची आहे. ज्याच्या हातात भगवा आहे त्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही, अजिबात नाही.
आज सुद्धा कदाचित तुमच्या वस्त्यांमध्ये फोन येत असतील, मतदान नाही केलं तर पाणी तोडू, वीज तोडू. अरे हिंमत असेल तर करून दाखव, गाठ शिवसेनेशी आहे. जिथे जिथे शिवसेना जाते तिथे गुंडाची दहशत आम्ही मोडून काढतो, हा शिवसेनेचा इतिहास असल्याचे ठाकरे म्हणाले.
आता तुमच्याकडे कोणी स्क्वेअर फुटांचा हिशोब घ्यायला आला तर त्यांना म्हणा चल फूट! काँग्रेस-राष्ट्रवादी तुम्ही आम्हाला विरोध करतात तर करा पण आम्हाला विरोध करताना तुम्ही बकासुराला निवडून देत आहेत. जिथे हॉस्पिटलच नाही तिथे १ रुपयात आरोग्य चाचणी देणार कशी? म्हणून सर्व जिल्ह्यांत मी एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा देणार आहे, असे आश्वासन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिले.