बारामती तालुक्यातील सामाजिक चळवळीच्या मुशीतून उभारी घेतलेल्या दौंड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष निरीक्षक बापूराव सोलनकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. मूळचे ढेकळवाडीचे असलेले सोलनकर हे महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर चळवळीशी कनेक्ट झाले. त्यानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीस प्रारंभ झाला. चळवळीतील एक एक कार्यकर्ता जोडत जाताना त्यांची वैचारिक कक्षा रुंदावत गेली. वयाच्या विशीपासून या उमद्या नेतृत्वाने यशवंत सेना, रासपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस असा प्रवास करीत राजकीय प्रगल्भता सिद्ध केली आहे. सोलनकर यांनी राजकीय क्षेत्रात सामाजिक चळवळीचा शिलेदार म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाटचालीवर टाकलेला प्रकाशझोत…
पुणे – बापूराव सोलनकर हे मूळचे ढेकळवाडीचे. शालेय शिक्षण ढेकळवाडी तसेच माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण भवानीनगर येथील श्री छत्रपती विद्यालयात झाले. राजकीय जीवनाला त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी सामाजिक चळवळीत झोकून कामास सुरुवात केली. त्यानंतर 1997 मध्ये चळवळीत सक्रिय होताना यशवंत सेनेचे बारामती तालुकाध्यक्ष झाले. सामाजिक चळवळीशी निगडित असताना त्यांना लोकांचे प्रश्न समजले. त्यानंतर त्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
2003 मध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर मोरगाव पंचायत समिती गणातून पहिल्यांदा निवडणूक लढवली. रासपाच्या वतीने त्यांनी छत्रपती कारखाना, माळेगाव कारखाना निवडणुकीत उमेदवार उतरविले. इतकी मोठी संघटन बांधणी केली होती. तळागाळातील कार्यकर्त्यांचा एकसंघ फळी आणि समाजाने कुटुंबाशी निगडित असलेल्या प्रश्नांची थेट भेदण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली आहे. बारामती तालुक्यात त्यांनी दुष्काळी गावात चारा छावणी, पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आंदोलने केली आहेत. बारामती येथील टोलनाका बंद करण्यासाठी त्यांनी निदर्शने करून प्रशासनाचे आणि तत्कालीन प्रस्थापितांचे लक्ष वेधून घेतले होते.
रासपाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. 2016 पर्यंत त्यांनी रासपचे काम तळागाळापर्यंत पोहोचवले. धनगर समाजाला संघटित करून एक नवीन युवा नेतृत्वाची झलक संपूर्ण राज्याला दाखवली. दरम्यान, रासपात मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी रासपा सोडली. त्यानंतर 2016 ते 2018 मध्ये भाजपचे काम सुरू केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत संस्काराचे बाळकडू घेतलेले आणि शिस्तीची जन्मगुटी त्यांच्यात भिनली असल्याने त्यांनी समाजाची नस पुरेपूर ओळखली होती. त्यामुळे बारामतीच्या राजकीय पटलावर सोलनकर यांचा दबदबा निर्माण झाला आहे. याच सामाजिक कामाची दखल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली अजितदादांनी सोलनकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना राष्ट्रवादीच्या संघटनासाठी सहभागी करून घेतले.
बारामती तालुक्यातील धनगर समाजातील युवापर्व आणि उदयोन्मुख नेता म्हणून नावारूपास आले. यामागे त्यांची सामाजिक बांधिलकी आणि तळागाळातील लोकांसाठी धडपडण्याची प्रवृत्ती जमेच्या बाजू ठरल्या आहेत. अजितदादा पवार यांनी सोलनकर यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर दौंड तालुका राष्ट्रवादी पक्ष निरीक्षकपदी नियुक्ती केली. 2019 मध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी दौंड तालुक्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फळी भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दौंड तालुक्यात विरोधकांचे प्रबळ आव्हान असताना सोलनकर यांनी नियोजनबद्ध काम सुरू केले. मागील निवडणुकीत दौंड तालुक्यातून राष्ट्रवादीची पीछेहाट झाली होती. पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली होती.
सामाजिक चळवळ आणि संघटन बांधणीचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी तालुक्यामध्ये धनगर समाजाला संघटित केले. त्यातून पक्षाचे प्राबल्य वाढवले. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधात रमेश थोरात यांनी लढत दिली होती. मागील निवडणुकीतील आमदार राहुल कुलांचे 15 हजारांचे मताधिक्य घटवले. यावरूनच सोलनकर यांच्या कामाची पद्धत अधोरेखित होत आहे. अजितदादा यांच्या विश्वासातील सोनलकर हे तरुण नेता, पदाधिकारी आहेत. दादांशी थेट संवाद साधताना त्यांची विकासकामाप्रती आस्था सर्वसामान्यांसाठी आशावादी ठरणारी आहे. विकासकामांचा ध्यास ही त्यांची शिदोरी सर्वसामान्यांसाठी सुखावणारी आहे.
दिवसभराच्या धावपळीच्या वेळापत्रकातून अजित दादा हे कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात. त्यांच्याकडून मतदारसंघातील आढावा घेतात. त्यामुळे दादा जरी राज्यभर फिरत असले तरी त्यांनी मतदारसंघातील नागरिकांशी नाळ जोडली आहे. अजितदादा यांच्या विश्वासातील विकासाभिमुख आणि संघटन बांधणीचा शिलेदार म्हणून सोलनकर यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अजित पवार हे विरोधकांना नेहमीच सन्मानाची वागणूक देतात, याची शिकवण आम्हालाही मिळत असते.
मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतात. काही ठिकाणी विकासकामाची पाहणी करतात. धनगर समाजातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. राज्यातील प्रश्न शासनदरबारी मांडून लोकांना न्याय दिला आहे. वडिल बाळासाहेब सोलनकर, आई भागीरथी सोलनकर, भाऊ अनिल सोलनकर, पत्नी आशा सोलनकर, मामा हनुमंतराव घुले, मुलगा वैभव सोलनकर, कार्यकर्ते, हितचिंतकांच्या भरभक्कम पाठबळावर त्यांची वाटचाल दिशादर्शक ठरत आहे. एका चळवळीतून कामास सुरूवात केलेल्या सोलनकर यांनी सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी स्नेह जोपासला आहे. ही त्यांची पद्धत अजातशत्रूची प्रचिती देणारी ठरली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी झटणारा नेता
पक्षनिरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मंत्रालयात उपमुख्यमंत्री दादांच्या माध्यमातून हाताळले आहेत. कामांचा निपटारा करून दिला आहे. दौंड तालुक्यात माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेशआप्पा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करण्याचा ध्यास घेतला आहे. तालुक्यातील गावपातळीपर्यंत लोकांशी संपर्क आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याची हातोटी हे सोलनकर यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे रमेशआप्पा यांच्यासारखा धडाडीचा काम करणारा आणि जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून अर्थकारणाची नस ओळखणाऱ्या नेत्यांसाठी सोलनकर हे कार्यरत आहेत. सोलनकर यांच्या वाटचालीत शरद पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मोलाचा वाटा आहे. दादांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी विकासकामाचे अनुभव पाठीशी आले. सुप्रिया सुळे यांचे विकासकार्य आणि सर्वसामान्यांविषयी असलेल्या निष्ठेची प्रचिती आली आहे.
शब्दांकन – प्रमोद ठोंबरे