कार्ला, {संजय हुलावळे} – यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे टप्पे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा लांबल्याने लाखो रुपये भरून कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याचे मावळ तालुक्यातील शिक्षकांचे नियोजन फसले आहे. सहलीच्या आनंदावर विरजण पडले आहे. पर्यटन कंपन्यांकडून घेतलेले पॅकेज रद्द करण्याची वेळ शिक्षकांसह, शासकीय कर्मचारी, पालकांवर आली आहे. त्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
महाराष्ट्रात एरवी एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुका यावर्षी २० मे पर्यंत पुढे गेलेल्या आहेत. २०१९ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक ही ११ एप्रिल ते १९ मे या दरम्यान सात टप्प्यात झाली होती. महाराष्ट्रात ११ एप्रिल ते २९ एप्रिलदरम्यान चारच टप्प्यात होऊन २३ मे रोजी मतमोजणी झाली होती. २०१९ मध्ये एप्रिल महिन्याअखेरीस महाराष्ट्रातील निवडणुका संपल्यानंतर मे महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश पर्यटकांनी देशात तसेच परदेशातही सहलींचे नियोजन करून आनंद घेतला होता.
मागील निवडणुकांच्या तारखांचा अंदाज घेऊनच पर्यटकांनी यावर्षीही पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे पूर्वनियोजन करून पॅकेज ठरवली होती. विशेषतः मुलांना मे महिन्यात शाळांना सुटी असल्याने सर्व पालक, शिक्षक आदी पर्यटक फिरायला जाण्याचे नियोजन करीत असतात. महाराष्ट्रातील २० मे पर्यंत लांबलेल्या निवडणुकांमुळे शिक्षकांचे सुटीचे नियोजनही कोलमडणार आहे.
येथील बरेच शिक्षक मे महिन्यात मोठी सुट्टी असल्यामुळे गावी जाणे, शेतातील कामे करणे, लग्न समारंभ, शुभकार्य यामध्ये सहभागी होणे, मित्र-परिवार, नातेवाईक यांच्या गाठीभेटी घेणे, असे अनेक नियोजन करतात. परंतु निवडणुकांमुळे एकंदरीत शिक्षकांच्या सुट्टीचे सर्वच नियोजन कोलमडून जाणार आहे.
सुटीचा मे महिना निवडणुकीत व्यस्त
यंदा आपल्या देशात १९ एप्रिल ते एक जूनदरम्यान सात टप्प्यांत लोकसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे या दरम्यान पाच टप्प्यात मतदान होणार आहे. चार जून रोजी मतमोजणी होणार आहे. जवळपास मे महिना निवडणुकीत व्यस्त जाणार आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांनी उन्हाळ्याच्या मोठ्या सुटीत जे पर्यटनाचे नियोजन केले होते, ते रद्द करावे लागणार आहे. त्यामुळे महिला आणि विशेषतः लहान मुलांचा हिरमोड झाला आहे.
शासनाकडून विनंती अमान्य
शिक्षकाला निवडणुकीचे काम देऊ नका, अशी विनंती शिक्षक संघटनांनी शासनाला केली होती. परंतु शासनाने यावर विचार केला नाही.लोकसभा निवडणुकीमुळे नाईलाजास्तव आम्ही सहलीचे नियोजन रद्द केले असल्याचे शिक्षक सांगत आहेत.
निवडणूक तारखांचा अंदाज चुकला
महाराष्ट्रात मूळ गावी जाणारे हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आहेत. तसेच दीर्घ सुटी असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परदेशी अथवा देशांतर्गत प्रवासाचे नियोजन यापूर्वीच केले आहे. अचानक निवडणुकांच्या तारखा एप्रिल व मे महिन्यात जाहीर झाल्यामुळे सहलीचे हे संपूर्ण नियोजनच कोलमडले आहे. लाखो रुपये भरून कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याचे घेतलेले पॅकेज रह करण्याची वेळ शिक्षकांवर आलेली आहे.