मुंबई – महाविकास आघाडीतील तीन पक्षांमधील कुरबुरी सुरुच असल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही. तसेच निर्णय प्रक्रियेत घेत नसल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर कॉंग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे, करोनावर मात करुन आलेले अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच या बैठकीला हजेरी लावली होती.
थोरात म्हणाले, राज्याचे काही प्रश्न घेऊन आम्ही एकत्र बसलो होतो. चक्रीवादळ झाले, त्या पाहणीसाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. त्यामुळे एखादा निर्णय होत असताना त्यात कॉंग्रेसचे मतही विचारात घेणे आवश्यक आहे. कॉंग्रेसच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अर्थातच राज्याच्या हिताच्या असून याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत व आमचं म्हणणं त्यांच्या कानावर घालणार आहोत.
तसेच महाविकास आघाडीतील कॉंग्रेस हा घटकपक्ष आहे. आम्ही 12 मंत्री आहोत. राज्याचे काही विषय घेऊन चर्चा झाली. करोना संकट, वादळ आहे. पालकमंत्री, संपर्कमंत्री यांची चर्चा झाली. सरकार म्हणून आमची चर्चा झाली, असे थोरात म्हणाले.