नवी दिल्ली – बजाज ऑटो कंपनी इलेक्ट्रिक वाहने निर्माण करण्यासाठी नवा प्रकल्प अकुर्डी येथे सुरू करणार असून या प्रकल्पातून वर्षाला पाच लाख इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येते.
बजाज ऑटोने पाच महिन्यापूर्वी इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन निर्मितीसाठी नवी उपकंपनी निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितले की, 2001 मध्ये आम्ही पल्सर बाजारात आणली होती. 2021 मध्ये आम्ही चेतक स्कूटरचे पुनरुज्जीवन केले आहे. आता आम्ही इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देणार आहोत. यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पामध्ये तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. इलेक्ट्रिक वाहनाचे युग आले असून आम्ही यासंदर्भात संशोधन आणि विकासापासून निर्मिती आणि वाहतूकी पर्यंत नवी व्यवस्था उभारणार असल्याचे ते म्हणाले.
पाच लाख वर्ग फूटावरील या नव्या प्रकल्पात 800 कर्मचारी काम करणार आहेत. जून 2022 मध्ये या प्रकल्पातून पहिले वाहन बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.