पुणे/मंचर – मावळ आणि आंबेगाव तालुक्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. आंबेगाव तालुक्यात ही शर्यत घेण्यासाठी आम्ही व्यापक तयारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या निर्णयानंतर अशी व्यापक शर्यत पहिल्यांदाच होत होती.
आम्ही या शर्यतीसाठी काही दिवसांपुर्वी परवानगी मागितली होती. अखेरच्या क्षणापर्यंत जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारणार असल्याची कोणतीही कल्पना दिली नाही. ही परवानगी नाकारल्याचा आदेश आम्हाला शुक्रवारी रात्री नऊ वाजता मिळाला, असे आढळराव यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्हाला करोनाची सुधारीत आचारसंहिता उशीरा आली. त्यानसार आम्ही शर्यतीची परवानगी नाकारण्याचा आदेश साडेसात वाजता काढला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च पातळीवर घेतलेल्या निर्णयाची जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ अंमलबजावणी केली आहे.
मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी बैलगाडा शर्यतीची परवानगी नाकारण्यात आली आहे. ही शर्यत नंतर घेण्यात येईल. पशू क्रुरता प्रतिबंधात्मक कायद्यात राज्य सरकारने केलेल्या सुधारणांनंतर गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने शर्यती घेण्यास परवानगी दिली होती.