ठाणे – “देशात जे वाईट घडते त्याची चर्चा अधिक होते, परंतु देशात ४० पट अधिक चांगले काम सुरू आहे. मी हे फिरताना बघतो, पण ज्यांचे डोळे आणि कान उघडे आहेत, त्यांना ते दिसते. अनेक जण नि:स्वार्थ भावनेतून चांगले काम करीत आहेत. ठाण्यातील कर्करोग रुग्णालय हे त्यापैकीच एक काम आहे,” असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हंटले आहे. ठाणे येथील बाळकूम-साकेत भागातील महापालिकेच्या ग्लोबल इमारतीच्या परिसरात धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते रविवारी झाले. यानिमित्त ते बोलते होते.
“शासन, समाज, जितो यांसारख्या संस्था संवेदनशील आहेत म्हणून उत्कृष्ट काम होत आहे. पण, ज्यांच्यासाठी आपण सेवा करतोय, त्यांनाही विचारायला हवे. त्यांना दिलासा कसा मिळेल, या दृष्टीने काम व्हायला हवे, ही अपेक्षा आहे आणि ती भविष्यात पूर्ण होईल. यातूनच समाजाला विश्वास मिळेल. आजच्या काळात चांगले आरोग्य आणि शिक्षण हवे आहे. मात्र, हे हवे असेल तर त्या सुविधा आपल्या देशात अपुऱ्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे,” असे भागवत म्हणाले. ज्या पद्धतीने आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्याला सध्याची जीवनशैली जबाबदार आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, दादा भगवान फाऊंडेशनचे दीपक देसाई, जीतो ट्रस्टचे विश्वस्त अजय आशर आदी उपस्थित होते.