गुवाहाटी- आसाममध्ये पूरस्थिती कायम आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांतील सुमारे एक लाख लोक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत. लोकांचे जगणे कठीण झाले आहे. येथे पुरामुळे 371 पेक्षा अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. लोकांना राहण्यासाठी घरे नाहीत आणि पोट भरण्यासाठी अन्नही मिळत नाही.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनंदिन पूर अहवालानुसार, रविवारी सोनितपूर, चिरांग, दारंग, धेमाजी, दिब्रुगढ, गोलाघाट, लखीमपूर, माजुली, शिवसागर आणि उदलगुरी जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 98,800 हून अधिक लोक प्रभावित झाले. त्याच वेळी, गोलाघाटमध्ये सर्वाधिक 29,000 लोक बाधित झाले आहेत. यानंतर धेमाजीमध्ये 28,000 आणि शिवसागरमध्ये 13,500 लोक त्रस्त आहेत.
दुसरीकडे, शनिवारी राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1.08 लाख लोकांना पुराचा फटका बसला. प्रशासन दोन जिल्ह्यांमध्ये 17 मदत छावण्या चालवत आहे, जिथे 2,941 लोकांनी आश्रय घेतला आहे. याशिवाय सहा जिल्ह्यांमध्ये मदत वितरण केंद्रे उघडण्यात आली आहेत.
सध्या जवळपास 371 गावे पाण्याखाली आहेत. आसाममध्ये 3618.50 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
याशिवाय बक्सा, बोंगाईगाव, चिरांग, कोक्राझार, लखीमपूर, नलबारी, उदलगुरी आणि तिनसुकिया येथे मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे अनेक गावांची अवस्था बिकट झाली आहे. सोनितपूर, धेमाजी, धुबरी, कोकराझार, मोरीगाव, बोंगाईगाव, चिरंग, गोलाघाट, लखीमपूर आणि माजुली जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे तटबंध, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुत्रा धुबरी, तेजपूर आणि नेमतीघाट येथे धोक्याच्या पातळीवरुन वाहत होती, तर तिची उपनदी दिखो शिवसागर उधळत होती.