मुंबई – प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सचिनने ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीतर त्याच्या घरासमोर आंदोलन करु, असा इशारा कडू यांनी दिला आहे. त्यामुळे आता सचिन तेंडूलकरच्या विरोधात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संदर्भात आमदार कडू यांनी सांगितले की, भारतरत्न असलेले सचिन तेंडूलकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहीजे. या भारताचा ते अभिमान आहेत. ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी माघार घ्यावी. या गेममधून सर्वांची मुक्तता व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या गेममुळे पालकांमध्ये प्रचंड रोष आहे.
एकिकडे गेममध्ये पैसे गुंतवू नका अशी जाहिरात करायची आणि दुसरीकडे गेमची जाहिरात करायची, असा दुहेरी धंदा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आमदार कडू यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र पाठवले होते.
मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्वस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या असल्याचे कडू यांनी यावेळी म्हटले होते.