जालना: राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच असून एकूण रुग्णांचा आकडा लाखांच्या वर गेला आहे. राज्य सरकारने विरोधी पक्षाला विश्वासात न घेतल्यानेच महाराष्ट्रात करोनाने हाहा:कार माजला आहे, असा घणाघात भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केला आहे. या युद्धात सरकारने सर्वांना सोबत घेऊन काम करणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला देलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. बबनराव लोणीकर म्हणाले, करोना लढाईत राज्य सरकारला विरोधी पक्षाचं 100 टक्के सहकार्य आहे. मात्र, राज्यातील मंत्र्यांमध्ये खुर्ची आणि श्रेष्ठतेवरुन वाद सुरु आहे. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नाही म्हणून कॉंग्रेसने वेगळी बैठक घेतली. कॉंग्रेस सारखा पक्ष सरकारमध्ये सहभागी आहे, तरीही विश्वासात घेतले जात नाही, अशी तक्रार करतो?, असा सवालही त्यांनी केला.
हे संकंट थांबवायचं असेल तर सरकारमधील तिनही पक्षांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे. या युद्धादरम्यान विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला सहकार्य आणि समर्थन राहील. येत्या 21 जूनपासून विधानसभेचं अधिवेशन सुरु होणार होते. सरकारने हे अधिवेश पुढे ढकलण्याचा प्रस्ताव ठेवला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाचे समर्थन केले, असेही त्यांनी सांगितले.