पुणे – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असावेत आणि त्यांच्याकडेच नेतृत्व राहावे, अशी इच्छा विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. दरम्यान, कोणी अयोध्याला जावो अथवा जाऊ नये, यापेक्षा रामाप्रती असलेली आस्था महत्वाची. हजारो लोक घरातून, जवळच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतील. त्यात कोणीही राजकारण करता कामा नये, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होत आहे. या कार्यक्रमास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुणे येथील निवासस्थानी प्रभू श्रीराम कृपा पूजा, दर्शन व आरतीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र परिसरातील उद्योगव्यवसायाला चालना देणारी केंद्रे बनत आहे. धार्मिक पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्रांच्या विकासाचे सर्वांनीच स्वागत केले पाहिजे.
मुख्यमंत्री आयोध्याला जाणार असून, रामलल्लांची प्रार्थना करणार आहेत. त्यानंतर आम्ही लवकरच सर्व आमदार- खासदार तेथे जाऊन दर्शन घेणार आहोत. दि. २३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार राज्यभर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. देशातील सर्व पीठासीन अधिकारी यांची २७ व २८ जानेवारी रोजी मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा होणार असल्याचे गोर्हे यांनी सांगितले.