नगर – राज्यात दारुविक्रीला परवानगी देऊन सरकाराने घराघरात नव्या अडचणी निर्माण केल्या आहेत. न सुटणारे प्रश्न त्यातून तयार झाले आहेत. त्यामुळे दारुविक्रीस परवानगी देणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून दारु दुकानांच्या रांगेत उभे असलेल्या तळिरामांना येथील जागरुक नागरीक मंचतर्फे चक्क चकणा वाटप करण्यात आले.
जागरूक नागरीक मंचचे सुहास मुळे यांच्या नेतृत्वाखाली कैलास दळवी, पहिलवान भैरवनाथ खंडागळे, योगेश गणगले, हरिभाऊ डोळसे, सुनील कुलकर्णी, राजू पडोळे, बी. यु. कुलकर्णी आदी सदस्य या अभिवन आंदोलनात सहभागी झाले होते. नगरमधील वाडियापार्क परिसररात असलेल्या एका दारुच्या दुकानासमोर रांगेत उभे असलेल्या नागरीकांना हा चकणा मोफत वाटण्यात आला. दारु खरेदीसाठी रांगेत उभे असलेल्या अनेकांना हे उपरोधिक आंदोलन आहे, याची पुसटशी कल्पनाही नव्हती.
काही जणांना मात्र जाणीवपूर्वक हे उपरोधिक आंदोलन असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात बोलताना सुहास मुळे म्हणाले, “”दारु विक्रीला परवानगी दिल्याने दोनच दिवसांत अनुचित घटनांत मोठी वाढ झाली आहे. आधीच करोनाची भीती. त्यात घरातील सदस्य घरातच असल्याने नवीन पेच निर्माण झाले आहेत. अनेकांना घरात खायला काहीच नाही, परंतु त्यांनाही दारु हवीय. याच मुद्यावर पती-पत्नीचे भांडण झाल्याने काल केडगावमध्ये एका विवाहितेने स्वत: विष घेऊन दोन मुलांनाही विष पासून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे माध्यमातून समजले.
त्यासह येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात देखील काही नवे रुग्ण दारू सेवनाच्या भांडणामुळे दाखल झालेले आहेत. त्यामुळे सरकारला मंदिर बंद करुन मदिरा सुरु करण्यात कसा रस आहे?, हेच समजत नाही. त्यामुळे या सरकाराना करावा तेवढा निषेध थोडाच आहे.” दरम्यान, नागरीकांना आता जीवनावश्यक वस्तुंची गरज राहिली नसल्याची टीका करत जागरूक नागरीक मंचतर्फे करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप बंद करण्यात आल्याची माहितीही मुळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.