कोल्हापूर – पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पदयात्रा काढत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण आहे.
ही बैठक उद्या 3 वाजता वर्षा बंगल्यावर होणार आहेत. राजू शेट्टी यांची पदयात्रा संध्याकाळी नृसिंहवाडी येथे पोहोचली. त्यावेळी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी तेथे सरकारच्या वतीने त्यांना निवेदन दिले.
आता मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. उद्याच्या बैठकीत निर्णय न झाल्यास रस्ते आडवावे लागतील. मंत्र्यांना गाव बंदी करावी लागेल. तरी देखील निर्णय घेतला नाही तर प्रत्येक गावातील नद्यांमध्ये जलसमाधी आंदोलन केले जाईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यानी केंद्राकडून होणाऱ्या अन्यायवर आवाज उठवावा. आम्ही तुमच्यासोबत येऊ. केंद्राने आपत्ती निवारण निधीमधून राज्याला भरघोस निधी द्यावा. यंदा आलेला हा पूर शतकातील मोठा पूर होता. दीड महिना लोटला तरी अजून केंद्रीय पथक पाहणीसाठी आलेले नाही. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे पूरग्रस्त त्रस्त आहेत. आमचं आयुष्य उद्ध्वस्त झाले.मग आमचा जगून काय उपयोग. म्हणून आम्ही आज जलसमाधी घ्यायला आलो होतो.
पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. माणसाने निसर्गाचे लचके तोडले आता निर्सग त्याच काम करत आहे. पूर्वी एक दोन दिवसात पूर येऊन जायचा आता 15 दिवस पूर जात नाही. या पूर परिस्थितीला भराव टाकलेले पूल कारणीभूत ठरत आहेत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.