केळघर (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बोंडारवाडी धरणाचे काम मार्गी लागण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांनी दिली. केळघर, मेढा विभागातील 54 गावांसाठी बोंडारवाडी धरण हा कळीचा मुद्दा असून धरण कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे. याला यश आले असून कृती समितीच्या विनंतीची तातडीने दखल घेऊन अधीक्षक अभियंता मिसाळ यांनी सातारा येथे कृती समितीसोबत नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी ट्रायल पिटचे काम जलसंपदा विभागाने तातडीने करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार श्री. मिसाळ यांनी लवकरच ट्रायल पिट केली जाईल, असे आश्वासन कृती समितीला दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना देत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनाही आवश्यक निर्देश दिले.
या बैठकीस कार्यकारी अभियंता एम. एस. धुळे, उपअभियंता जे. आर. बर्गे, कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, श्रमिक जनता संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे व उद्योजक नारायणशेठ सुर्वे उपस्थित होते. यावेळी सातारा विभागात नव्याने हजर झालेल्या कार्यकारी अभियंता श्री. मिसाळ यांचे कृती समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले.