सासवड, (प्रतिनिधी)- पुरंदर तालुक्यातील सासवड येथे पुरंदर उपसा योजनेच पाणी मिळत नसल्याने माळसिरस येथील शेतकरी प्रवीण कामठे यांनी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याने पुरंदरचा कार्यालयात एकच खळबळ उडाली. सासवड येथील पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात हा प्रकार घडला सुदैवाने पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून पुरंदर उपसाचे पाणी मिळत नाही. मात्र, गेल्या वर्षी पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी जानेवारीपासून पाणी मिळत नसल्याने सर्व पिके जळून खाक झाली आहेत. यामध्ये प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना जनावरांची विक्री करावी लागली आहे. पाण्याअभावी शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे हताश शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत.
अधिकारी फोन उचलत नसल्याने निर्णय
आम्हाला आज पाणी सोडणार होते. परंतु आज पाणी आले नाही. आंबळे या ठिकाणी पाणी सोडले असल्याची माहिती मिळाली. यानंतर आंबळे येथे काहींनी आम्हाला व सरपंचांना धक्काबुक्की केली. आम्हाला पुरंदर उपसाचे लगड या अधिकाऱ्यांनी पाणी दिले आहे, असे सांगण्यात आले. मात्र, लगड हे अधिकारी फोन उचलत नाहीत. त्यामुळे हा प्रकार करावा लागल्याचे शेतकरी प्रवीण कामठे यांनी सांगितले.