पुणे- सामाजिक सलोखा जपणाऱ्या दैनिक प्रभातच्या धायरी येथील मुद्रणालयावर सहा ते सात अज्ञात इसमांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास भ्याड हल्ला केला. या हल्लेखोरांनी अनधिकृतपणे कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर मुद्रणालयाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या खिडकीच्या काचा आणि सीसीटीव्ही फोडून हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, हा प्रकार तातडीने पोलिसांना कळवित प्रभातच्या वतीने सिंहगडरोड पोलीस अंकीत अभिरूची पोलीस चौकी येथे दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचे संतप्त पडसाद उमटले असून या समाजकंटकांना धडा शिकवण्याची मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून उमटत आहे. मंगळवारी (दि. 24) दुपारी हा घृणास्पद प्रकार घडला. कार्यालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भिंतीकडून या अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. दैनिक प्रभातचे नुकसान करण्याच्या हेतूने तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर कार्यालयाच्या पाठीमागील बाजूने हे हल्लेखोर पसार झाले.
तर मोठी दुर्घटना घडली असती
दैनिक प्रभातच्या सर्व आवृत्त्यांची छपाई या मुद्रणालयातून होते. मुद्रणालय कार्यालयाला 19 ते 20 खिडक्या आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक फोडण्यात आल्या आहेत. या घटनेच्यावेळी अनुचित प्रकार घडला असता, त्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
पोलिसांना गांभीर्य नाही
ही घटना घडल्यानंतर अभिरूची पोलीस चौकीचे मार्शल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी केली. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दैनिक प्रभातकडून सदर घटनेचा जागेवर जावून पंचनामा करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली. मात्र, पोलिसांनी त्यास सहकार्य न करता, पोलीस चौकीत फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. असे हल्ले झाल्यानंतर तरी पोलिसांनी तत्परता दाखविणे अपेक्षित होते. तेथे उदासीनता दिसली. पोलिसांकडून अशा प्रकारे ढिसाळपणा होत असल्यास अशा प्रवृत्तींना आळा बसणार कसा, असा प्रश्न उपस्थित होतो.
जुन्या प्रकारातूनच तर हल्ला नाही ना ?
दैनिक प्रभातच्या मुद्रणालयाशेजारील एका जागेत शहरातून गोळा केलेला शेकडो ट्रक राडारोडा स्वत:च्या भूखंडावर खाली करून घेणाऱ्या व्यावसायिकांनी बेदरकारपणे सर्व नियम धाब्यावर बसवून केलेल्या कृत्यामुळे दैनिक प्रभातच्या मुद्रणालयाची तब्बल 200 फूट रनिंग सीमाभिंत 19 मार्च रोजी पाडण्यात आली. सदर व्यावसायिकांनी हे करताना पालिकेने राडारोडा टाकण्यासाठी घालून दिलेले निर्बंध पायदळी तुडविले. याशिवाय सुमारे दहा वर्षांपूर्वी लावलेली तीन बदामाची झाडेही बेकायदा पध्दतीने मुळासकट पाडली. याबाबत सिंहगडरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.
त्यांनतर महापालिका उद्यान विभाग, घनकचरा विभाग आणि बांधकाम विभागाने संबंधित व्यावसायिकाला टाकलेला राडारोडा, अस्वच्छता झाल्याने, तसेच शेजारील मिळकतीस धोका झाल्याप्रकरणी नियमानुसार नोटीस बजावल्या आहेत. यावेळी या तुटलेल्या भिंतीमुळे अपप्रवृत्तीच्या व्यक्ती मुद्रणालयाच्या परिसरात घुसून भविष्यात तोडफोड करू शकतात अशी भीती व्यक्त करत त्याबाबत पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्याचाच राग मनात धरून हे कृत्य केले आहे का ? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करीत त्यांच्या मुसक्या आवळणे अत्यंत आवश्यक आहे.