पलामू ( atrocities against dalit families ) – झारखंडमध्ये एकीकडे सत्ता वाचवण्यासाठी आमदार मुख्यमंत्र्यांसह पर्यटनाला गेले असताना त्या राज्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील पलामूमध्ये दलित वर्गातील सुमारे 50 कुटुंबाना त्यांचे गाव सोडून जंगलात राहण्यास भाग पाडले गेल्याची बातमी देण्यात आली आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
एका विशिष्ट समुदायातील लोकांनी मारहाण करून त्यांना त्यांच्या गावातून हाकलून दिल्याचा आरोप दलित समाजातील लोकांनी केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनीही याप्रकरणी अहवाल मागवला आहे. याआधी झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील एका गावातील शाळेत प्रार्थना म्हणण्यास विरोध केला होता. आता त्याच समुदयाने दलित लोकांना गावातून बाहेर काढले आहे.
या घटनेसंदर्भात 12 नामांकित आणि 150 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची दखल घेत झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. राजभवनातून जारी केलेल्या निवेदनानुसार, राज्यपालांनी पलामूचे उपायुक्त ए दोड्डे यांना दोन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
दोड्डे म्हणाले की, पोलिसांना दोषींना तात्काळ पकडण्यास सांगितले आहे. या गावातील सर्व 50 कुटुंबांचे प्राधान्याने पुनर्वसन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कामासाठी मदत संस्था सक्रिय झाल्या आहेत, असे ते म्हणाले.