पाचगणी – कोविडमुळे महाबळेश्वर, पाचगणीतील पॉइंटस् पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते. पर्यटनावर गुजराण अवलंबून असलेले घोडे व्यावसायिक, स्टॉलधारक, हॉटेल व्यावसायिक या बंदीमुळे हवालदिल झाले होते. महाबळेश्वर तालुक्यातील विविध संघटना, राजकीय पक्षांनी येथील पर्यटनास परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे मागणी केली होती.
यासाठी आ. मकरंद पाटील यांनीही सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर महाबळेश्वर व पाचगणीतील सर्व पॉइंटस् पर्यटनासाठी खुले होणार आहेत. याबाबतची घोषणा आ. पाटील यांनी केली. महाबळेश्वर येथे हिरडा नाका येथे सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. खा. श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता व विविध विभागांचे प्रमुख बैठकीस उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्यांचा चरितार्थ पर्यटनावर अवंलबून आहे. कोविडच्या निर्बंधांमुळे महाराष्ट्राच्या नंदनवनातील व्यवसाय कोलमडले आहेत. आता राज्यातील निर्बंध शिथिल केल्याने येथील पॉइंटस् सुरू करण्यात येत आहेत; परंतु पर्यटकांनी कोविडच्या नियमांचे पालन करण्याची खबरदारी घ्यावी. दरम्यान, महाबळेश्वर व पाचगणीतील व्यावसायिक कर्जाच्या बोजाखाली आहेत. त्याबाबतही महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी हॉकर्स, घोडे व्यावसायिक, टॅक्सी व्यासायिकांनी केली आहे.