काबुल : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अंमल सुरू झाल्यापासून देशातील नागरिकात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. त्यातच अफगाणिस्तानमध्ये नगण्य असलेल्या हिंदू आणि शीख समुदायासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अशा परिस्थितीतही एका व्यक्तीने आपल्या कर्तव्यासह आपल्या धर्मावर किती प्रेम आहे याचे उदाहरण जगाला दाखवून दिले आहे.
अफगाणिस्तानमधील रतननाथ मंदिरातील पुजारी पंडित राजेश कुमारयांनी मंदिर सोडून जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यादरम्यान, तालिबानच्या हातून आपला मृत्यू झाल्यास ती मी माझी सेवा समजेन, असे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलवर तालिबानचा कब्जा झाल्यानंतर अफगाणिस्तान सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अमेरिकन सैन्याच्या माघारीबरोबर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीपासूनच लोकांनी देश सोडण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, इतर लोकांप्रमाणेच राजेश कुमार यांनाही काबुल सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक हिंदूंनी त्यांचा प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले होते. याबाबत माहिती देताना भारद्वाज यांनी सांगितले की, काबुलमध्ये रतननाथ मंदिराचे पुजारी पंडित राजेश कुमार यांनी सांगितले की, काही दिंदूंनी मला काबुल सोडण्याचे आवाहन केले होते.
तसेच माझ्या राहण्याच्या आणि प्रवासाची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र माझ्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपासून या मंदिरात सेवा केली आहे. मी हे मंदिर सोडून जाणार नाही. जर तालिबानने मला मारले तरी ती मी माझी सेवा समजेन, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, भारत अफगाणिस्तानमधील लहान शीख आणि हिंदू समुदायाला भारतात येण्यासाठी मदत केली जाईल. आम्ही अफगाण, शीख आणि हिंदू समुदायाच्या प्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात आहोत. आम्ही त्यांना भारतात परतण्यासाठी मदत करू. तत्पूर्वी अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासाकडून भारतीय नागरिकांना चार अॅडव्हायजरी जारी करण्यात आल्या होत्या.