शहरातील सर्वच बॅंकांची एटीएम रिकामी : नागरिकांची मोठी गैरसोय
जामखेड – येथील नागेश्वर यात्रौत्सवास आजपासून सुरुवात झाली असून अनेक बॅंकांच्या एटीएम मशीनमध्ये खळखळाट पाहण्यास मिळत आहे. एटीएममध्ये पैसेच नसल्याने नागरिकांसह यात्रेकरू त्रस्त झाले आहेत. सध्या यात्रौत्सवाचे दिवस सुरू असल्याने एटीएमसमोर लोकांच्या रांगाच्या रांगालागलेल्या दिसतात. अनेक एटीएम मशीनमध्ये पैसेच नसल्याचे निर्दशनास आले.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या जामखेडच्या नागपंचमी उत्सवास आज (सोमवार) पासून सुरुवात झाली आहे. एकेकाळी केवळ नर्तिकांच्या नृत्यांच्या डावासाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रेचे स्वरूप अलीकडे बदलले असून नागेश्वराची पालखी, कुस्त्यांचा हगामा आणि मनोरंजनाच्या खेळांनाही आता सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी राज्यासह परराज्यातील हजारो भाविक भक्त येत असतात.
प्रवासातील सुरक्षिततेच्या कारणासाठी अनेक भाविक रोख रक्कम जवळ बाळगणे टाळतात. त्यातही सर्वत्र एटीएम सुविधा उपलब्ध असल्याने त्या त्या ठिकाणी एटीएमद्वारे रक्कम प्राप्त करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. परंतू ऐन यात्रौत्सवातच शहरातील स्टेट बॅंक, कॅनेरा बॅंक, आयसीआयसी बॅंक,सेंट्रल बॅंक आदी बॅंकेच्या एटीएम मशीनमध्ये चलनाचा सातत्याने तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे ही एटीएम मशीन नेहमीच बंद असतात. एटीएम सुविधेमुळे नागरिकही रोख पैसे जवळ बाळगत नसल्याने एटीएम बंद असल्याने ऐनवेळी त्यांची धावपळ होते.
एसबीआय वगळता बहुतांश एटीएम मशीनमध्ये एजन्सीमार्फत चलन भरणा केला जातो. मात्र भरणा करणारी एजन्सी मशीनमध्ये चलन भरणा करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.सातत्याच्या खडखडाटाने ग्राहकांसह भाविक वैतागले आहेत. या समस्येवर तत्काळ उपाययोजना करून शहरातील सर्व एटीएम केंद्रांना सुरळीत चलन पुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहराच्या विविध भागात असणाऱ्या एटीएम केंद्रात हेलपाटे मारुन नागरिक आणि भाविक वैतागले आहेत.