मुंबई : मनासारखे खाते न मिळाल्याने रूसून बसलेले कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन हे खाते देखील सोपविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या खातेबदलास मान्यता दिली.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली. विजय वडेटटीवार यांना भूकंप पूनर्वसन खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला होता. संपूर्ण मदत व पुनर्वसन हा महत्वाचा विभाग न मिळाल्याने ते नाराज होते.
हे खाते शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडे होते. त्यामुळे नाराज झालेले वडेट्टीवार यांनी पदभार स्विकारला नव्हता. ओबीसी जनगणनेचा निर्णय झाला तेव्हा ओबीसी मंत्रालयाची धुरा सांभाळणारे विजय वडेट्टीवार अनुपस्थित असल्याची चर्चा झाली, मात्र आपण परवानगी घेउन अनुपस्थित राहिल्याचे ते म्हणाले होते. त्यांच्या नाराजीचा विषय दिल्ली हायकमांडपर्यंत गेला होता.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच दिल्लीतील हायकमांडच्या नेत्यांसोबत वडेट्टीवार यांची चर्चा झाली. त्यांना योग्य ते आश्वासन हायकमांडने दिल्यानंतरच वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली होती.
शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार यांच्याकडील भूकंप पुनर्वसन खाते सोपविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या खातेबदलास मान्यता दिली. त्यानुसार विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तर संजय राठोड यांच्याकडे वने , भूकंप पुनर्वसन या विभागाची जबाबदारी राहील.