मुंबई : आज देशात गोव्यासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमधील मतमोजणीचे निकाल लागणार आहेत. निकालाच्या पहिल्या फेरीमध्ये गोवा आणि उत्तर प्रदेशातही शिवसेनेची पीछेहाट होत असल्याचे दिसून येत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी संजय राऊत आणि शिवसेनेच्या इतर अनेक नेतेमंडळींनी केलेल्या प्रचारानंतर गोव्यात शिवसेनेचे खाते उघडण्याचा विश्वास बोलून दाखवला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मतमोजणी कलांविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“मी मतमोजणी पाहातोय. ती अजून सुरू आहे. पोस्टल बॅलेटवर जाऊ नका. दोन वाजेपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होईल. पंजाबमध्ये आप पुढे आहे, उत्तराखंडमध्ये टक्कर सुरू आहे. गोव्यात स्थिती अजून स्पष्ट नाही. उत्तर प्रदेशात भाजपा पुढे आहे. हे पुढे-मागे सुरूच राहणार आहे. गोवा आणि पंजाबसाठी आत्ताच काही अंदाज लावणं मला योग्य वाटत नाही. पण अखिलेश यादव आणि त्यांची आघाडी उत्तर प्रदेशात कडवी टक्कर देत आहे”, असे राऊत म्हणाले आहेत.
“पोस्टल बॅलेटवर संयमाने बोलायला हवं. २०-२० फेऱ्या होत असतात. बिहारमध्ये काय झालं हे तुम्ही पाहिलंच असेल. पंजाबमध्ये देखील अजून काही स्थिती स्पष्ट नाही. सर्व राज्यांमध्ये पूर्ण निकाल येईपर्यंत उद्याची सकाळ उजाडेल. गोव्यात माझ्यामते कुणालाही बहुमत मिळत नाहीये. खिचडी बऱ्याच ठिकाणी बनू शकते. फक्त गोव्यात नाही”, असे देखील राऊतांनी यावेळी सांगितले.
“आम्ही खूप चांगलं काम केलं होतं. ही आमच्या पक्षाची महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची सुरुवात आहे. कोणताही प्रमुख पक्ष राज्याबाहेर जाताना पहिल्यांदा संघर्ष करावाच लागतो. ही आम्ही पक्ष बाहेर नेण्याची सुरुवात केली आहे. आम्ही थांबणार नाही”, असा निर्धार यावेळी राऊतांनी बोलून दाखवला आहे.
दरम्यान, २०१७ मध्ये बहुमत असूनही अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे गोव्यात काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावं लागलं होतं. तसा काही प्रकार यावेळी होणार नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. “गेल्या वेळी गोव्यात जे झालं, ते यावेळी होणार नाही. पी. चिदम्बरम तिथे बसले आहेत. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. त्यांना महाराष्ट्राकडून जी काही मदत लागेल, ती आम्ही देऊ”, असे ते म्हणाले.