भाजप आणि आरएसएसकडून संस्कृती आणि भाषांवर अतिक्रमण
गुवाहाटी – आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. संघवाल्यांच्या हाती आसाम जाऊ देणार नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भाजप आणि आरएसएसला आसामची संस्कृती, भाषा यावर अतिक्रमण करु द्यायचे नाही हे लक्षात ठेवा. आसामचा राज्य कारभार लोकशाही पद्धतीनेच चालला पाहिजे हे विसरु नका, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
गुवाहाटी येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात राहुल गांधी बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे. सध्या देशात जे काही सुरु आहे त्यामागे भाजपाचा नियोजनबद्ध कट आहे. भाजपा जिथे जाईल तिथे द्वेष पसरवण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. आसामच्या जनतेला असा द्वेष पसरवणारे लोक मान्य नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी आणि जीएसटी लादून देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली आहे. भारतमातेवर आघात करण्याचे काम त्यांनी केले आहे. देशात आज बेकार युवक नोकरीसाठी वणवण भटकत असून या सरकारने किती लोकांना रोजगार दिला, हे मोदींनी सांगायला हवे, असे आव्हानच राहुल यांनी दिले.
आसामची संस्कृती, आसामचा इतिहास यावर आम्ही तुमचे आक्रमण होऊ देणार नाही, असे भाजपला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. आपण सगळे एक राहिलो तर येथे द्वेष पसरवण्याचे कुणाचेही कारस्थान यशस्वी होणार नाही, असे राहुल म्हणाले.