हांगझोऊ :- चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीत भारताने सलामीच्या लढतीत उझबेकिस्तानचा 16-0 असा दणदणीत पराभव केला. भारताच्या ललित उपाध्यायने सर्वाधिक चार तर वरुण कुमार व मनदीप सिंग यांनी प्रत्येकी 3 गोल केले.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने 5 पदकांची कमाई केली होती. पदकांचे खाते उघडले असले तरीही अद्याप भारताला सुवर्णपदकाची प्रतीक्षाच आहे. भारताच्या रोइंग संघाने 2 रजत आणि एक ब्रॉंझपदक तर नेमबाजीत एअर रायफल संघाने एक रजत आणि एक ब्रॉंझपदक मिळवले आहे.
हॉकीमधील सलामीच्या लढतीत भारतीय पुरुष संघाने उझबेकिस्तानचा 16-0 असा दणदणीत पराभव करत थाटात प्रारंभ केला. ललितने चार गोल केले, तर त्याला तोलामोलाची साथ देताना वरुण व मनदीप प्रत्येकी तीन गोल केले. आता या गटात भारताचा सामना सिंगापूरशी होणार आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात भारताकडून ललित कुमारने पहिल्या क्वार्टरमध्ये सातव्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच वरुणने एक गोल केला व आघाडी 2-0 अशी वाढवली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये अभिषेकने गोल केला. यावेळी आक्रमक मनदीपने तर, सामन्याच्या 24 व्या मिनिटाला ललितने आणखी एक गोल करत संघाची आघाडी 5-0 अशी केली. मनदीपने 27 व्या व 28 व्या मिनिटाला लागोपाठ दोन गोल केले व पहिला हाफ संपेपर्यंत 7-0 अशी आघाडी वाढवली. दुसऱ्या हाफमध्येही भारताने आपले वर्चस्व कायम राखले. ललित, वरुण व मनदीपला सुरेख साथ देताना अमित रोहिदासने 38 व्या, सुखजीत सिंगने 42 व्या, समशेर सिंगने 43 व्या, संजयने 57 व्या मिनिटाला गोल केले. ललितने 7 व्या, 24 व्या, 37 व्या आणि 53 व्या मिनिटाला गोल केले. त्याची आशियाई स्पर्धेतील लढतीतील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
या विजयासह तीन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या भारताने पुरुष हॉकी स्पर्धेच्या अ गटात पहिले स्थान मिळवले आहे. प्रत्येक गटातून दोन अव्वल संघ थेट उपांत्य फेरीत दाखल होतील. आता मंगळवारी सिंगापूरचा पराभव केला तर भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.