पाल्लेकेले :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात साखळीतील लढत होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या सामन्याकडे संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.
आशिया करंडक स्पर्धेत सलामीच्या लढतीत यजमान पाकिस्तानने ज्या पद्धतीने नेपाळविरुद्ध फलंदाजी केली ती पाहता भारतीय संघासमोर मोठे आव्हान राहणार आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार आहे.तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूनं लागला आहे.कर्णधार रोहित शर्मानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास?
या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. गेले दोन दिवस येथे वारंवार पाऊस पडत आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण 50 षटकांचाच होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामना किमान 20 षटकांचा खेळवण्यात यश आले तर निकाल हाती येणार आहे. मात्र, ते देखील शक्य झाले नाही व सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना गुण वाटून दिले जातील. अशा स्थितीत सलामीच्या लढतीत नेपाळचा पराभव केलेला पाकिस्तानचा संघ सुपर फोरसाठी पात्र ठरेल मात्र, भारतीय संघाला पात्र होण्यासाठी नेपाळविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल.