आळंदी – संपूर्ण देशभरात विशेषतः महाराष्ट्रात विना आमंत्रित असणारा भक्तिमय अद्वितीय असा लक्षणीय संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा दि. 11 जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भावी अलंकापुरी नगरीत दाखल होतात व दुसऱ्या दिवशी लाखोंच्या संख्येने हरिनामाचा गजर करीत सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होतो. यंदा या सोहळ्यात भाविकांची संख्या ही लक्षणीय असणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
पालखी सोहळा दि. 12 जून रोजी आळंदीहून पुणे मुक्कामी राहील. दि. 14 रोजी सासवडकडे प्रस्थान ठेवेल. दि. 15 रोजी पालखीचा मुक्काम सासवड येथेच राहिल. दि. 16 रोजी जेजुरीत मुक्काम, दि. 17 रोजी वाल्हे मुक्काम, दि. 18 रोजी नीरा स्नान होवून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल आणि लोणंद येथे मुक्काम तसेच दि. 19 रोजीही लोणंदमध्येच मुक्काम राहील, दि. 20 रोजी तरडगाव, दि. 21 रोजी फलटण, दि. 22 रोजी बरड, दि. 23 रोजी नातेपुते, दि. 24 रोजी माळशिरस, दि. 25 रोजी वेळापूर, दि. 26 रोजी भंडी शेगाव, दि. 27 रोजी वाखरी, दि. 28 रोजी पंढरपूर तसेच दि. 29 रोजी देवशयनी आषाढी एकादशी ते दि. 3 जुलै 2023 पौर्णिमेपर्यंत दिंडीचा मुक्काम पंढरपुरातच असणार आहे.
दि. 3 जुलै रोजी गोपालकाला घेऊन पालखी परतीच्या प्रवासासाठी अलंकापुरीकडे मार्गस्थ होईल.