मुंबई – शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर प्रसिद्धी झोतात आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जीवनात लवकरच बायोपिक येणार असल्याच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या.आता याबाबत स्वतः वानखेडे यांनी खुलासा केला आहे. एका हिंदी वृत्तपत्राशी बोलताना समीर वानखेडे यांनी आपल्या बायोपिकबाबत भाष्य केलं आहे.
आपल्या बायोपिकबाबतचे अधिकार अद्याप कोणालाही दिलेले नसल्याचे यावेळी वानखेडे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “कोणत्याही चित्रपट निर्मात्याला माझ्या जीवनकथेवर चित्रपट बनवायचा असेल तर त्याला आधी माझ्याशी भेटावे लागेल आणि माझी एनओसी घ्यावी लागेल.’माझा बायोपिक बनवण्याचा, लिहिण्याचा किंवा प्रमोशन करण्याचा अधिकार मी कोणत्याही निर्माता, लेखक किंवा मुलाखतकाराला दिलेला नाही. तसेच माझा असा कोणताही हेतू असल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले.
निर्माता वसीम अख्तरने वानखेडे यांच्या बायोपिकचे हक्क त्याच्या वडिलांकडून घेण्याबद्दल बोलले होते, याबाबत वानखेडे यांना विचारले असता ते म्हणाले, “कोणत्याही जिवंत व्यक्तीवर चित्रपट बनवताना प्रथमतः त्याची स्वतःची परवानगी घेणं आवश्यक आहे. याबाबत माझ्या कुटुंबातील कोणाच्याही संमतीला किंवा असहमतीला काही अर्थ नसल्याचे देखील यावेळी वानखेडे यांनी स्पष्ट केले.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक ‘मैं अटल हूं’च्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या निर्मात्यांनी वानखेडे यांच्याशी संबंधित असलेल्या बायोपिकच्या निर्मितीची जबाबदारी घेतल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसारित झाल्या होत्या. त्यामुळे वानखेडे यांच्यावर येणाऱ्या बायोपिकची सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र आता या बायोपिकच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.