नवी दिल्ली – दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आणि नियुक्तींचा अधिकार दिल्ली सरकारकडे असेल असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी दिला. त्यानंतर केंद्र सरकारने एक अध्यादेश काढत हे अधिकार दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे बहाल केले. दिल्ली कोणाची यावरून हा संघर्ष सुरू असताना आता केंद्राच्या अध्यादेशाच्या विरोधात राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी केजरीवाल सगळ्यांच्या भेटी घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकाजुर्न खर्गे यांची भेट घेणार असून भेटीची वेळही मागितली आहे.
केजरीवाल यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देण्यास दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे केजरीवाल आता राहुल आणि खर्गे यांना भेटणार असल्याच्या बातमीमुळे कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित प्रक्षुब्ध झाले आहेत. संदीप हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आणि माजी खासदार आहेत. त्यांनी या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांचा एक व्हिडिओ जारी केला असून त्यात केजरीवाल हे कॉंग्रेसची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
जुने जे नालायक लोक असतात त्यापैकीच केजरीवाल एक आहेत अशी अत्यंत विखारी टीका संदीप दीक्षित यांनी केली आहे. आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी केजरीवाल कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपला स्वार्थ साधेपर्यंत ते तुमच्याशी संबंध ठेवतील. त्यानंतर ते कोणाच्याही पाठित सुरा भोसकतील. अशा अप्रामाणिक माणसाला कॉंग्रेसने भेटायची गरज आहे का? अशी तिव्र प्रतिक्रिया दीक्षित यांनी दिली आहे.
यापूर्वी अजय माकन आणि दिल्ली कॉंग्रेसमधील अन्य नेत्यांनीही केजरीवालांना समर्थन देण्यास कॉंग्रेसला विरोध केला आहे. मुळात दिल्लीत कॉंग्रेसची जी एकहाती सत्ता होती तिला केजरीवाल यांनीच सुरूंग लावला होता व त्यापुढेही ज्या ज्या राज्यात त्यांनी कॉंग्रेस दुबळी होत गेली त्या राज्यांत कॉंग्रेसलाच लक्ष्य करत आपला जनाधार वाढवण्याचे काम सुरू केले असल्यामुळे कॉंग्रेस नेत्यांची त्यांच्यावर नाराजी आहे. काही कॉंग्रेस नेते तर केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला भारतीय जनता पार्टीची बी टीम असेही संबोधतात.
केंद्र सरकारच्या अध्यादेशाशी संबंधित विधेयकाला निष्प्रभ करण्यासाठी केजरीवालांना राज्यसभेत काही मते कमी पडत आहेत. कॉंग्रेसने जर त्यांना पाठिंबा दिला तर त्यांचा हेतू साध्य होऊ शकतो. मात्र त्याबाबत कॉंग्रेसने आतापर्यंत निर्णय घेतलेला नाही. आता खर्गे आणि गांधी कुटुंब काय कौल देतात यावर केजरीवालांच्या प्रयत्नांचे यश अवलंबून असणार आहे.