सातारा – राज्यभरातील पांडुरंगाचे निस्सीम भक्त वारकरी ज्या वेळेची वाट पाहत असतात ती वेळ आता जवळ येत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून 10 जूनला तीर्थक्षेत्र देहू येथून तुकोबारायांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
यावर्षी 29 जूनला देवशयनी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे. त्यामुळे आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होतात. या वारीमध्ये महिला वारकऱ्यांचा देखील मोठ्याप्रमाणात सहभाग असतो. अगदी लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अश्या अनेक महिला वारकऱ्यांचा या वारीमध्ये समावेश असतो.
आरोग्य वारी उपक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेण्यात आली असून महिला वारकऱ्यांच्या आरोग्याविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महिला आयोगाकडून करण्यात आली आहे.
‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन उपलब्ध करून द्यावी. तसेच महिला सुरक्षिततेकरिता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परिसरात दर्शनी भागात लावावेत.
स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करुन देण्यात यावा. पालखी सोहळ्याकरिता निर्भया पथक तैनात करण्यात यावे. तसेच दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय आणि न्हाणी घराची व्यवस्था असावी. अश्या मागण्या महिला आयोगाकडून करण्यात आल्या आहेत.