मुंबई – रिपब्लिक टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी मुंबईतून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर चौथ्या स्तंभावर हल्ला केला जातोय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्यावर पत्रकार संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करता येणार नाही. हे व्यक्तिगत प्रकरण असून त्याचा पत्रकारितेशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे अर्णब गोस्वामीला झालेली अटक हा चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे म्हणणे अयोग्य ठरेल’, अशी भूमिका पत्रकार संघटनांनी घेतली आहे.
“फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले”
अर्णब गोस्वामी यांना दोन वर्षांपूर्वीच्या वास्तुविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमूद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अटक झाली आहे. गोस्वामी यांच्याकडून एका कामाची मोठी रक्कम येणे होती, पण ती ते देत नसल्याने नाईक यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. याप्रकरणी गोस्वामी विरोधात अलिबाग पोलीसांनी गुन्हाही दाखल केला होता. पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटूंबियांनी या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.
त्यानंतर गृहमंत्री अनिल देखमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार चौकशी करून पोलीसांनी आज गोस्वामींना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. अर्णब गोस्वामीमुळे दोघांनी आत्महत्या केलीय, त्यामुळे या घटनेचा निषेध करणे योग्य नाही.
पत्रकारितेची झूल पांघरून वाट्टेल ते उद्योग करणाऱ्यांची पाठराखण आम्ही करू शकत नाही. कायद्याला त्यांचे काम करू देणे हेच बरोबर आहे, असे मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने स्पष्ट केले आहे.
पोलीसांनी मला मारलं – अर्णब गोस्वामी
तसेच या प्रकरणावर टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशननेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्णब गोस्वामिंना झालेली अटक ही व्यक्तिगत प्रकरणातून आहे. त्याचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. कायद्याला आपले काम करू द्यावे. न्याय व्यवस्थतून सत्य काय आहे ते समोर येईल, अशी भूमिका घेतली आहे.