मुंबई – आर्किटेक्ट अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्रींना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना पोलीस कोठडी न देता थेट न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तथापि अलिबागच्या लोअर कोर्टाच्या या निर्णयाला पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात आव्हान दिले असून त्याची सुनावणी अलिबागच्या कोर्टात येत्या 9 तारखेला होणार आहे.
अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा हे या प्रकरणातील आरोपी असून या सर्वांनाच अटक करण्यात आली आहे. त्या सर्व आरोपींची चौकशी करायची असल्याने त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. तथापि, लोअर कोर्टाने अर्णव व अन्य दोन आरोपींना थेट न्यायालयीन कोठडी दिली आहे.
या निर्णयावर पोलीस समाधानी नसल्याने त्यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी अलिबाग सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अर्णब यांना सध्या अलिबाग कारागृहाचे कोविड सेंटर म्हणून जे ठिकाण आहे त्या शाळेच्या इमारतीत त्यांना ठेवण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून
अर्णब गोस्वामी यांना आजही उच्च न्यायालयाने तातडीने दिलासा देण्यास नकार देत जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. या अर्जावर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
या सुनावणीवेळी दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने कोणतीही तारीख निश्चित न देता आपला निर्णय राखून ठेवला आहे. मात्र, आरोपी नियमित जामिन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज करू शकतात, असे नमूद केले.