नवी दिल्ली – केंद्र सरकारने जाहीर केलेली “अग्निपथ’ योजना रद्द होणार नसून या योजनेअंतर्गत लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच भरती अगोदर युवकांना हिंसा आणि तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असल्याचेही लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले.
तिन्ही सेना दलाच्या वतीने आज संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी ही माहिती दिली.
अनिल पुरी म्हणाले की, सैन्य भरतीतील हा बदल गेल्या अनेक महिन्यांपासून प्रस्तावित होता. या सुधारित बदलांमुळे देशातील तिन्ही दलांमध्ये तरुण आणि अनुभवी लोक एकत्र आल्याने देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी सुधारेल. आज 30 वय असलेले अनेक सैनिक आहेत. तसेच, अधिकाऱ्यांना पूर्वीपेक्षा खूप उशीरा कमांड मिळत आहे. लष्कराचे वय कमी करणे हे आमचे प्राधान्य आहे. भारताच्या तिन्ही सैन्यात संवेदना आणि उत्साह याचा चांगला मिलाफ असावा, अशी आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
दरवर्षी सुमारे 17,600 लोक तिन्ही दलांमधून मुदतपूर्व निवृत्ती घेत आहेत. निवृत्तीनंतर काय करणार, असा प्रश्न त्यांना कोणी विचारण्याचा प्रयत्न केला नाही. अग्निवीरांना सियाचीन आणि इतर भागात तैनात करताना तोच भत्ता मिळेल जो सध्या सेवा बजावत असलेल्या नियमित सैनिकांना लागू आहे. सेवेच्या बाबतीत अग्निवीरांसाठी कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
पुढील 4-5 वर्षांत आम्ही 50 ते 60 हजार भरती करू आणि नंतर 90 हजार ते एक लाखपर्यंत वाढवू. त्याचबरोबर भारतीय सशस्त्र दलाच्या या योजनेची नितांत गरज आहे, त्यामुळे ती मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात, तिन्ही सेवांमध्ये अधिका-यांच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या सर्व भरती केवळ अग्निपथ योजने’द्वारेच केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
योजनेचे विश्लेषण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही पहिल्या वर्षी 46 हजार भरती करून छोटी सुरुवात केली आहे. नजीकच्या भविष्यात अग्नीवीरांची संख्या 1.25 लाखांपर्यंत पोहोचणार आहे. देशसेवेत बलिदान देणाऱ्या अग्निवीरला एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र बॅरेक किंवा प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था केली जात नाही.
अग्निवीरलाही नियमित सैनिकांच्या बरोबरीने सुविधा मिळणार आहेत. विद्यमान पायाभूत सुविधांचा लाभ घ्या. विविध मंत्रालये आणि विभागांकडून अग्निवीर’ आरक्षणाची घोषणाही करण्यात येणार आहे. त्यामुळे चार वर्षांची सेवा बजावल्यानंतर अग्निवीरांना विविध विभागात काम करता येणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, योजनेच्या घोषणेनंतर झालेल्या जाळपोळ, तोडफोड आणि हिंसाचाराला प्रतिसाद म्हणून हे स्पष्टीकरण नाही, असेही ते म्हणाले.
– 24 जूनपासून पहिल्या बॅचचे रजिस्ट्रेशन
– 24 जुलैपासून ऑनलाईन परीक्षा
– डिसेंबरमध्ये पहिल्या बॅचचा निकाल
– 30 डिसेंबरपासून प्रशिक्षणास सुरूवात